भिवंडी : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडीत नागरिकत्व सुधारणा कायदा विरोधात मोठं विधान केलं. महाराष्ट्रात नागरिकत्व सुधारणा कायदा (NRC) लागू होऊ देणार नाही हा माझा शब्द आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडीत आक्रमक भाषण केलं.
केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NPR) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NRC) कायद्याविरोधात संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने भिवंडीत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जितेंद्र आव्हाडांनी केंद्र सरकारवर जोरदार तोफ डागली. हे कायदे संविधान विरोधी असल्याचे जाहीर केलं.
‘देशातील असंख्य हिंदू जातीतील नागरीक आपल्या वाडवडिलांचे अंत्यसंस्कार कोठे केले ते सांगू शकत नाही. परंतु मुस्लीम आपल्या पूर्वजांच्या कब्र दाखवू शकतात. महाराष्ट्रातील पारधी, कोल्हाटी समाज आजही आपले पुरावे दाखवू शकणार नाही. मोदी सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे,’ असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
केरळ, पंजाब या राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार नाही, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. भिवंडीत संविधान बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून कै.परशराम टावरे क्रीडांगण येथे मोहम्मद शब्बीर अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जाहीर सभेत व्यासपीठावर डॉ. जितेंद्र आव्हाड ,योगेंद्र यादव , माजी न्यायमूर्ती बी जे कोळसे पाटील, उमर खालिद , माजी आयपीएस अधिकारी अब्दुल रेहमान, सलामत साबरी, डॉ मोहम्मद कामरान, मुस्तफा फारूक यांसह विद्यार्थिनींची प्रतिनिधी उपस्थित होते.