मुंबई : काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपात मेगाभरती झाली होती. आता सत्तापालट होताच भाजपचे पंधरापेक्षा जास्त आमदार भाजपला रामराम ठोकून काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे भाजपला राज्यात खिंडार पडण्याची शक्यता आहे.
भाजपमध्ये अंतर्गत राजकारणामुळे आमदार कंटाळले असून ते भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले आणि भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले सुमारे पंधरापेक्षा जास्त आमदार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या गोटातून करण्यात आला आहे. या आमदारांची राजीनामे देण्याची तयारी असून ते तिन्ही पक्षनेत्यांच्या संमतीची प्रतीक्षा करीत असल्याचे समजते. भाजपच्या या आमदारांमध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांचा समावेश असून आणखी चार आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले आहे.
आमदारकीचे राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढण्याची तयारी असलेल्या आमदारांविषयी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे भाजपचे आमदार निर्णयाची प्रतिक्षा करत आहेत. त्यामुळे भाजपला मोठा झटका बसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करुन विजयी झालेले सात आमदार संबंधित पक्षांच्या नेत्यांशी संपर्कात आहेत, तर एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांचा प्रभाव असलेले भाजपचे चार असंतुष्ट आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे समजते. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर पूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.