मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या 89 वर पोहोचली आहे. राज्यामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडून आज दोन आठवडे झाले. पुण्यातील महिलेला कोरोनाची लागण झाल्याची पहिली घटना 9 मार्च रोजी समोर आली होती. भारत सध्या ‘COVID-19’ च्या दुसऱ्या टप्प्यात असला, तरी तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. या टप्प्यात समूह संसर्ग होण्याची भीती आहे.
कोरोनाचा तिसरा टप्पा नेमका काय आहे…
एखाद्या व्यक्तीला जेव्हा कोरोनाची लागण होते, मात्र संसर्गाचा स्त्रोत ओळखणे कठीण असते, संबंधित व्यक्तीचा कोणत्याही कोरोना संक्रमित देशात किंवा एकूणच परदेशात प्रवास झालेला नसतो. तसेच कोरोनाग्रस्त व्यक्तीशी तिचा थेट संपर्क आलेला नसतो, तेव्हा हा (तिसरा) टप्पा ‘समूह संसर्ग’ म्हणून ओळखला जातो. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) ने भारत अद्याप त्या टप्प्यावर अधिकृतपणे पोहोचला नसल्याचं सांगितलं आहे.
‘आयसीएमआर’चे म्हणणे असूनही, कोरोनाची लागण झालेल्या काही अलिकडच्या घटना चिंता निर्माण करणाऱ्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये उत्तर परगणा जिल्ह्यातील डमडम येथे राहणाऱ्या 57 वर्षांच्या रहिवाशाचा परदेशात प्रवासाचा इतिहास नाही.
पुण्यात परदेशी प्रवास न केलेल्या किंवा त्यांच्याशी थेट संपर्क न आलेल्या 41 वर्षे महिलेला व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. या महिलेची प्रकृती गंभीर असून खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दिल्लीतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात येऊन माहिती घेतली आहे.
या महिलेच्या संपर्कातील सहापैकी चार जणांना बाधा झाल्याचे अहवालात स्पष्ट म्हटलं आहे. चार व्यक्तींमध्ये महिलेच्या मुलाचाही समावेश आहे. त्याचबरोबर तिची बहीण, बहिणीचा पती आणि मुलीला बाधा झाली आहे. या सर्वांवर नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या पाचही जणांची परदेश प्रवास किंवा संबंधित प्रवाशांच्या संपर्काची कोणतीही पार्श्वभूमी नाही. मात्र ती महिला एका लग्नासाठी नवी मुंबईतील वाशी येथे गेली होती. तिथे तिचा एखाद्या कोरोनाग्रस्त व्यक्तीशी संपर्क आला असावा, असा संशय आहे.