नवी दिल्ली : नागरिकत्व कायद्याविरुद्ध बेमुदत आंदोलन सुरू आहे. शनिवारी तिथेही गोळीबाराची घटना घडली. शाहीन बाग आणि जामिया मिलिया इस्लामियामध्ये रविवारी अशांतता पसरवण्याचा कट रचला जात आहे, असा दावा आम आदमी पक्षानं केला आहे. तसं पत्र आम आदमी पक्षानं निवडणूक आयोगानं पाठवलं आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अडथळे निर्माण करण्यासाठी काही राजकीय पक्ष ‘अशांतता किंवा हिंसाचार’ घडवू शकतात, असा दावा आम आदमी पक्षानं केला आहे. शाहीन बाग आणि जामिया मिलिया इस्लामियामध्ये रविवारी अशांतता पसरवण्याचा कट रचला जात आहे, असा दावाही पक्षानं केला आहे. हा कट उधळून लावण्यासाठी दिल्ली पोलीस आणि अन्य यंत्रणांना आवश्यक पावलं उचलण्याचे निर्देश दिले जावेत, अशीही मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना पत्र…
आम आदमी पक्षानं निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना पत्र पाठवलं असून, दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आणि निवडणुकीत अडथळे निर्माण करण्यासाठी काही समाजविघातक घटक आणि काही राजकीय संघटना संगनमत करून अशांतता आणि हिंसाचार घडवून आणण्याचा कट रचत आहेत, असा दावा केला आहे. या पत्राबरोबर त्यांनी व्हिडिओही पाठवला आहे. काही लोक सरिता विहारच्या जवळ एकत्र मोठ्या संख्येनं जमा होण्याचं आवाहन करत असल्याचं त्यात दिसतं. दिल्लीच्या निवडणुकीत अडथळे निर्माण करण्याचा कट रचला जात आहे असा आम्हाला संशय आहे, असंही आपनं म्हटलं आहे.
दिल्लीचे पोलीस उपायुक्त चिन्मय बिस्वाल यांनी दिली ही माहिती…
शाहीन बाग येथे नागरिकत्व कायद्याविरुद्ध बेमुदत आंदोलन सुरू असून शनिवारी तिथेही गोळीबाराची घटना घडली. हल्लेखोराने तीन गोळ्या हवेत झाडल्या. हा इसम नोएडा भागातून आला होता. त्याला अटक करण्यात आली आहे. दिल्लीचे पोलीस उपायुक्त चिन्मय बिस्वाल यांनी या घटनेबाबत माहिती दिली.
संबंधित इसमाने हवेत गोळीबार केला. त्यानंतर बंदोबस्तावरील पोलिसांनी तत्काळ कारवाईचे पाऊल उचलत हल्लेखोराच्या मुसक्या आवळल्या, असे बिस्वाल यांनी सांगितले. हल्लेखोराचे नाव कपिल गुर्जर असे आहे. तो दिल्लीतील दल्लूपुरा भागातील राहणारा असल्याची माहिती पुढे येत आहे. ‘भारतात दुसऱ्या कुणाचाही नाही फक्त हिंदूंचाच आवाज चालेल’, असे पोलिसांना सांगत हल्लेखोराने आपल्या कृतीचे समर्थन केले आहे.