मुंबई : भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेकडून जीवाला धोका असल्याचं पत्र राज्यपाल आणि गृह सचिवांना लिहिलं आहे. मागील दोन वर्षांपूर्वीं तुझ्यावर जो हल्ला झाला तो लक्षात ठेव अशी धमकी देणारा फोन आपल्याला आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
सत्ता आल्यानंतर शिवसेनेने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. सत्तेत आल्यावर शिवसेनेने धमकी दिल्याचा आरोप सोमय्यांनी केला. राज्याच्या गृहसचिवांना आणि राज्यपालांना यासंदर्भात पत्र लिहीले. या संदर्भातले वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.
मी शिवसेनेच्या धमक्यांना भीक घालत नाही…
किरीट सोमय्या म्हणाले शिवसेनेच्या असल्या धमक्यांना भीक घालत नाही, माझं जे काम आहे ते मी सुरुच ठेवणार आहे. असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. दरम्यान या धमकीबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली आहे का ? असे विचारले असता आपण मुख्यमंत्र्यांना अशी माहिती दिली नाही. मात्र भाजपाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला असंही सोमय्या यांनी स्पष्ट केलं.
किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंवर भ्रष्टाचाराचे जाहीरपणे आरोप केले होते. तेंव्हापासून सोमय्या विरुध्द शिवसेना असा वाद सुरु झालेला आहे. सोमय्या यांना लोकसभा निवडणुकीत त्याच वादावरून शिवसेनेनं तिकीट न देण्यासाठी भाजपवर दबाव आणला होता. शिवसेनेच्या दबावामुळे सोमय्यांचे तिकीट कापण्यात आले होते.