मुंबई : भारतातील अस्पृश्यता निवारणाविषयी केलेल्या विधानावरून अभिनेते शरद पोंक्षेंवर चोहोबाजूंनी टीका होऊ लागली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पोंक्षे यांच्या निशाणा साधला आहे. ‘हा डोक्यावर पडला काय?,’ असा सवाल आव्हाड यांनी एक ट्विटवरून केला आहे.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील ‘मी सावरकर’ वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात अभिनेते शरद पोंक्षे यांनी देशातील अस्पृश्यता निवारणाबाबत व्यक्त केलेल्या मतामुळे विवादाला तोंड फुटले आहे.
कार्यक्रमात बोलताना अभिनेते शरद पोंक्षे यांनी सावरकरांचं योगदान श्रेष्ठ असल्याचं म्हटलं. “अस्पृश्यता निवारणात सावरकरांचं मोठं योगदान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यापेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे. डॉ. आंबेडकर आणि महात्मा फुले हे त्या-त्या जातीत जन्माला आल्यानं त्यांना अपमानाचे चटके बसले. त्यामुळे विद्रोह करत प्रवाहाविरोधात लढले. मात्र अस्पृश्यतेचा कोणताही चटका बसला नसतानाही सावरकर ब्राह्मणाविरोधात उभे राहतात. समाजातील जातीच्या भिंती फोडण्यासाठी आयुष्य व्यतीत करतात. त्यामुळे दोन्ही राष्ट्रपुरुषांपेक्षा सावरकर श्रेष्ठ आहे,” असा दावा पोंक्षे यांनी केला होता.
अस्पृश्यता निवारणात आंबेडकर आणि फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ : शरद पोंक्षे..
.
हा डोक्यावर पडला काय बोलतो त्याचे त्यालाच कळते कि नाही माहित नाही— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 2, 2020
जितेंद्र आव्हाड यांनी केलं ट्विट…
पोंक्षे यांनी केलेल्या विधानानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. “अस्पृश्यता निवारणात आंबेडकर आणि फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ : शरद पोंक्षे… हा डोक्यावर पडला काय बोलतो त्याचे त्यालाच कळते कि नाही माहित नाही,” अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.