मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस. यानिमित्त त्यांनी त्यांच्या यशाचे किस्से आज जाहीरपणे बोलून दाखवले. शरद पवार म्हणाले, सार्वजनिक जीवनात यश-अपयश हे येत असतेच. मात्र या साऱ्यातून उठून उभे राहण्याची ऊर्जा जर मला कोणाकडून मिळाली असेल तर ती माझ्या आईकडून आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेकडून मिळाली आहे.
शरद पवार यांचा वाढदिवस राष्ट्रवादीने बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा केला. यानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पवारांनी आईचे स्मरण केले. आजचा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे तो माझा वाढदिवस आहे म्हणून नाही, तर १२ डिसेंबर याच दिवशी माझ्या मातोश्रींचाही जन्म झाला म्हणून. शिवाय १३ डिसेंबर हा माझ्या पत्नीचा वाढदिवस असतो. अनेक जवळच्या मित्रांचा वाढदिवस येतो, त्यामुळे हा दिवस माझ्या नेहमी लक्षात राहतो, असंही पवार म्हणाले.
आपण ज्या माणसांच्या परिवर्तनासाठी, त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी लढतोय त्यांची शक्ती आपल्याला मिळाली तर कोणतेही संकट आपण पार करू शकतो. त्यामुळेच मी माझ्या सहकाऱ्यांना नेहमी सांगत असतो की आपले जीवन हे समाजाच्या शेवटच्या माणसाच्याही उपयोगाला यायला हवं’, असे आवाहनही पवार यांनी केले.
शरद पवार म्हणाले, माझ्या मातोश्रींनी मोठे कष्ट घेऊन आम्हाला वाढवले. त्या शेती करायच्या, तर वडील नोकरी करायचे. शेतीत जे काही पिकत असे, ते बाजारापर्यंत नेण्याची व्यवस्थाही करायचे. त्या काळातही आमच्या मातोश्रींच्या विचारांची झेप मोठी होती. त्या लोकल बोर्डावर काम करत होत्या. आपल्या समाजाचा विकास कसा करायचा या विचाराने भारावलेल्या होत्या. मुलींच्या शिक्षणासाठीही त्या सदैव आग्रही असत. मातोश्रींच्या पावलावर पाऊल ठेवूनच आज आम्ही सारे कार्य करत आहोत, अशा भावना पवारांनी व्यक्त केल्या.