राजस्थान : राजस्थान सरकारने राज्यातील सरकारी शाळांमधून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि पंडित दीनदयाल उपाध्याय,डॉ. हेडगेवार, श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे फोटो हटवण्याचे आदेश दिले आहेत. अशोक गहलोत यांच्या सरकारने फोटो हटवण्याचं आदेश देणारे एक पत्रकच शाळांसाठी जारी केलं आहे. तसेच या आदेशाचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सरकारने म्हटलं आहे.
गहलोत सरकारने सरकारी शाळांमधील सावरकर, उपाध्याय, माजी सरसंघचालक डॉ. हेडगेवार, श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे फोटो काढून त्याऐवजी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्याचे आदेश दिले आहेत. राजस्थानमध्ये भाजपा सत्तेत आल्यानंतर सरकारी शाळांमध्ये सावरकर, उपाध्याय, हेडगेवार, श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र हे सर्व नेते भाजपाचे आदर्श असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. हे नेते विद्यार्थ्यांसाठी आदर्श नसल्याचेही काँग्रेसचे मत आहे. त्यामुळेच हे फोटो काढण्याचे फर्मान राज्यात सत्तेत असणाऱ्या काँग्रेस सरकारने जारी केलं आहे.
भाजपाने राजस्थान सरकारच्या या निर्णयाचा कठोर शब्दात निषेध केला आहे. सरकार महापुरुषांमध्ये भेदभाव करत आहेत असा आरोप भाजपाने केला आहे. राजस्थानचे माजी शिक्षण मंत्री वासुदेव देवनानी यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.