मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना एकामागून एक धक्के बसत आहेत. माजी आमदरांसह ४५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याची घटना ताजी असताना मुंबईतही वंचित बहुजन आघाडीत मोठी फूट पडली आहे. मुंबईमधील वंचित आघाडीच्या सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिका-यांसह एकूण ५०० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष राहुल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी अशा एकूण ५०० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत विक्रोळी पश्चिमेकडील कैलास कॉम्प्लेक्स सभागृहात झालेल्या कार्यक्रमात या कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला.
शरद पवारांच्या नेतृत्वाखाली प्रवेश सोहळा संपन्न…
अकोला येथील माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांच्यासह ४५ पदाधिका-यांनी राजीनामे दिले होते. आज पुन्हा मुंबईतील ५०० पदाधिका-यांनी सामुहिक राजीनामे दिले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लोकसभा, विधानसभेला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात दंड धोपटले होते. मात्र, वंचितला यश मिळवता आले नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत शेवटपर्यंत वंचितला सोबत घेण्यासाठी प्रयत्न केला. परंतु आंबेडकरांनी एकला चलोरेची भूमिका घेतली. मात्र, त्यामध्ये त्यांना मोठा फटका बसला. काँग्रेस, ऱाष्ट्रवादी काँग्रेसआघाडीला काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीसह भाजपला पर्याय निर्माण करण्याचा आंबेडकरांचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नांना खीळ बसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.