मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र बँक (PMC बँक) घोटाळ्यात जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचा लवकरच लिलाव केला जाण्याची शक्यता आहे. लिलावासाठी जप्त केलेल्या मालमत्तांचे मूल्य निश्चित करण्याकरिता बँकेने व्हॅल्यूअर नेमणुकीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे मालमत्तांची विक्री करून नुकसान भरून काढले जाणार आहे. यातून १६ लाख ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी आज शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेने ३२ हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. पोलिसांकडून दाखल केल्या जाणाऱ्या चार्जशीटमध्ये HDILकंपनीचे संचालक राकेश वाधवा, सारंग वाधवा, माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, बँकेचे माजी अध्यक्ष वरियम सिंग,माजी संचालक सुरजीत सिंग अरोरा यांना आरोपी बनवण्यात आले आहे. दरम्यान, विविध तपास यंत्रणांनी चौकशी दरम्यान जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय बँक प्रशासकाकडून घेण्याची शक्यता आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये विमान आणि याॅटचा, आलिशान मोटारी यांचा समावेश आहे.
Mumbai Police’s Economic Offences Wing (EOW) submitted first charge sheet in Punjab & Maharashtra Cooperative (PMC) Bank scam against 5 persons — Rakesh Wadhavan, Sarang Wadhavan,Waryam Singh, Joy Thomas & Surjit Arora. https://t.co/QZruwCApJR
— ANI (@ANI) December 27, 2019
HDILकंपनीच्या संचालकांकडे जवळपास ३० हजार कोटींची मालमत्ता आहे. पीएमसी बँकेत जवळपास ५ ते ६ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा अंदाज आहे. या नुकसानीची वसुली करण्यासाठी बँकेकडून जप्त केलेल्या मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यासाठी बँकेकडून व्हॅल्यूअर नेमणुकीसाठी प्रस्ताव मागवले आहेत. मालमत्तांची विक्री करून नुकसान भरून काढले जाणार आहे. यातून १६ लाख ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
PMC बँक घोटाळ्याचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ३२ हजार पानांचे आरोप पत्र आज दाखल करण्यात आले. तीन महिन्यांच्या तपासानंतर आर्थिक गुन्हे शाखेने आरोप पत्र तयार केले आहे. या आरोपत्रात पहिल्यांदाच पोलीसांनी ‘जागल्या’चा (whistleblower) उल्लेख केला आहे. HDIL कंपनीची बनावट कर्ज खाती आणि त्यात घोटाळा झाल्याचे जागल्याच्या निदर्शनात आले. त्यानंतर त्याने ही बाब बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला कळवली. या घोटाळ्याची माहिती रिझर्व्ह बँकेला कळवली नाही तर आत्महत्या करु, असा इशारा व्यवस्थापनाला दिला होता मात्र त्याकडे व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले. या मुद्द्यावर जागल्या आणि वरिष्ठ व्यवस्थापनात वाद झाला त्यानंतर घोटाळा समोर आला. घोटाळ्यानंतर रिझर्व्ह बँकेने ‘पीएमसी’ बँकेवर निर्बंध घातले. यात लाखो लोकांचे पैसे अडकले असून मानसिक तणावाने काही खातेदारांनी आत्महत्या केली तर काही खातेदारांचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.