मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचे फोन टॅप झाल्याचा आरोप तत्कालीन फडणवीस सरकारवर करण्यात आला आहे. फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंह आणि राज्य गुप्तचर विभागाचे सहआयुक्त अमितेश सिंह यांचा या समितीमध्ये समावेश आहे. या प्रकरणाची ही दोन सदस्यीय समिती तपास करणार आहे.
विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषणा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले, असा आरोप करण्यात आला होता. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी फोन टॅपिंगचा आरोप केला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले होते.
पेगासेस आणि फोन टॅपिंगबद्दल भाजप प्रचंड अस्वस्थ आहे. फोन टॅपिंग ही विकृती आहे. ही विकृती का केली याची चौकशी पाहिजे. लोकांच्या खासगी आयुष्यात डोकवण्याची गरज काय आहे. तुमचे आणि माझे राजकीय मतभेद आहे. ही विकृती असून याची चौकशी होत आहे. ही विकृती कोणी केली हे संपूर्ण देशाला आणि जगाला कळाले पाहिजे. पेगासेस विकत घेण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला होता का? हा प्रश्न देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला होता.