मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंती वर्षानिमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाने राज्यातील चार विभागात ७५ किलोमीटर भव्य पदयात्रेचे नियोजन केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे यांनी दिली आहे.
पदयात्रेची सुरुवात मराठवाडा विभागातून केली जाणार असून गुरुवारी ३० जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, औरंगपुरा, औरंगाबाद येथून पहिल्या पदयात्रेची सुरुवात होणार आहे. तर रविवार २ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ जन्मस्थळ मातृतीर्थ, सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा येथे या पदयात्रेचा समारोप होणार आहे. औरंगाबाद येथून सुरु होणाऱ्या पदयात्रेला अखिल भारतीय सेवादलाचे अध्यक्ष लालजी देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव मंगलसिंह सोळंकी हे उपस्थित राहणार आहेत. तर पदयात्रेचा सांगता समारंभ बुलढाणा येथे २ फेब्रुवारीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, महिला व बालविकास मंत्री यशोमतीताई ठाकूर आणि पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंती वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचेही नियोजन करण्यात आलेले आहे. यात ७५ स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान, ७५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत, ७५ शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा सन्मान, ७५ आदर्श शिक्षकांचा सन्मान, वृक्षारोपण, ७५ गावांमध्ये ग्रामस्वच्छता अभियान यासारखे उपक्रम राबविले जाणार असल्याची माहितीही औताडे यांनी दिली आहे.
मुकुल वासनिक यांच्या उपस्थित बुलढाण्यात २ फेब्रुवारीला समारोप…
रविवार २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ जन्मस्थळ मातृतीर्थ, सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा येथे या पदयात्रेचा समारोप होणार आहे.