नदिया (प. बंगाल): देशात शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असलेल्या नागरिकांवर गोळ्या चालवल्या जात आहेत. आसाममध्ये एनआरसीमुळे आतापर्यंत १०० जणांचा बळी गेला आहे तर पश्चिम बंगालमध्ये एनआरसीच्या भीतीने ३१ जणांचा मृत्यू झाला आहे, असा धक्कादायक दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
नदिया जिल्ह्यात आयोजित एका सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. भाजपशी असहमत असलेल्या प्रत्येकाला दहशतवादी ठरवण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपकडून सध्या राबवला जात आहे, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी यावेळी केला. देशात आधीच सीएए आणि एनआरसीवरून आंदोलनांचा वणवा भडकलेला असतानाच ममता यांनी गंभीर आरोप केल्याने या आंदोलनाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.