मुंबई : भाजपाचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेने प्रस्ताव दिला तर भाजपा सत्तास्थापनेसाठी तयार असल्याचं वक्तव्य केलं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला टोला लगावला. मी येतो अशी भाजपाची इच्छा आहे. त्यांना सोबत घ्यायचं की नाही हा निर्णय शिवसेनेचा आहे. शिवसेनेनं कमळाबाईला सोडलं आहे, असाही टोला मलिक यांनी हाणला.
भाजपाची इच्छा आहे, परंतु शिवसेना त्यांच्यासोबत जाईल की नाही हे शिवसेनेला विचारलं पाहिजे, असं मलिक म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. “हे शहाणपण यापूर्वी का सुचलं नाही? असं म्हणते भाजपा सत्तेशिवाय राहू शकत नसल्याचं मलिक म्हणाले. मी येतो अशी भाजपाची इच्छा आहे. त्यांना सोबत घ्यायचं की नाही हा निर्णय शिवसेनेचा आहे,” असं ते म्हणाले. तसंच शिवसेनेनं कमळाबाईला सोडलं आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
काय म्हणाले होते सुधीर मुनगंटीवार…
शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. आताही शिवसेनेनं प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापनेसाठी भाजपाकडून अडचण नाही. ‘देर आये दुरूस्त आये, सुबह का भूला श्याम को आया’ असं आम्ही समजू,” असं मुनगंटीवार म्हणाले होते. त्याचबरोबर “मनसेला सोबत घ्यायची आज तरी आवश्यकता नाही. तसा प्रस्तावही मनसेकडून आलेला नाही. पण, समविचारी पक्षांना सोबत घेण्याची भाजपाची भूमिका आहे,” असं सांगत त्यांनी मनसेबाबत भाजपाचं मत अनुकूल असल्याचंही अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवलं.