मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याला (CAA) देशभरात विरोध होत आहेत. भाजप महाराष्ट्र विधानसभेत CAA प्रस्ताव आणण्याची मागणी करत आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं हल्ला चढवला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत असा प्रस्ताव आणण्याऐवजी बिहारमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर सरकार चालवणाऱ्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांना समजवा. त्यांचा या कायद्याला पाठिंबा घ्या,’ असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी हाणला आहे.
विरोधकांनी सीएए, एनआरसीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सभागृहात सरकारची कोंडी करण्याची रणनीती भाजपनं आखली आहे. भाजपच्या या राजकीय खेळीवर नवाब मलिक यांनी सडकून टीका केली आहे. ‘सीएए कायद्याला देशातील मोठ्या वर्गाचा पाठिंबा नाही. या कायद्याला पाठिंबा मिळावा म्हणून भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील नेते देशात फिरताहेत. पण सीएएला पाठिंबा देण्यासाठी लोक समोर येताना दिसत नाहीत. असं असूनही भाजप मानायला तयार नाही.
महाराष्ट्राच्या विधानसभेत सीएएच्या पाठिंब्याचा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न केला जातोय. पण विधानसभा हे ‘सीएए’चं व्यासपीठ नाही. तो केंद्राचा कायदा आहे. त्याची अंमलबजावणी केंद्रानं करायची आहे. इथं प्रस्ताव आणून काय फायदा,’ असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला आहे.
‘कॅग’च्या अहवालावरुन लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न…
फडणवीस सरकारच्या काळातील निर्णयांवर ‘कॅग’च्या अहवालात ताशेरे ओढण्यात आले आहेत. सिडकोमध्ये अडीच हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा ठपका ‘कॅग’नं ठेवला आहे. याबाबतचे प्रश्न सभागृहात विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं भाजपची अडचण होणार आहे. लक्ष उडवण्यासाठीच भाजप CAA मुद्दा पुढं करत आहे. राज्याशी या कायद्याचा संबंध नाही. हा प्रस्ताव आणून राजकारण करण्याचं काम भाजपनं करू नये. असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.