नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर मोदी सरकारने ५ ऑगस्ट २०१९ पासून जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि महेबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहेत. मात्र त्यांच्या सुटकेसाठी प्रार्थना’ करतो, असं वक्तव्य भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलंय.
काश्मीरचे नेते फारुक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि महेबुबा मुफ्ती यांच्या सुटकेनंतर काश्मीरची परिस्थिती सामान्य होण्यासाठी मदत करतील, अशी आशाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलीय.
‘काश्मीरमध्ये सध्या शांततेचं वातावरण आहे. परिस्थिती तेजीनं सुधारतेय. सुधारणेसहीत नेत्यांच्या सुटकेचा निर्णयही लवकरच घेतला जाईल. सरकारनं कुणाचाही विश्वासघात केलेला नाही’ असं म्हणत राजनाथ सिंह यांनी सरकारच्या निर्णयाला पाठिंबाही व्यक्त केला. काश्मीरच्या हितासाठी काही निर्णय घेण्यात आलेत, त्यांचं स्वागत व्हायला हवं अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली.
उल्लेखनीय म्हणजे, ५ ऑगस्ट २०१९ पासून फारुक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि महेबुबा मुफ्ती हे काश्मीरचे तीनही नेते नजरकैदेत आहेत. त्यांच्यासहीत शाह फैजल, सरताज मदानी, हिलाल लोन, अली मोहम्मद सागर आणि नईम अख्तर यांच्यावरही सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलीय.