मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीला धक्का देत भाजपानं रात्रीच्या अंधारात सत्तास्थापनेचा दावा केला आणि सकाळीच शपथविधीही उरकला. तिन्ही पक्षांनी शपथविधीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. आज रविवारी ११:३० वाजता याचिकेवर सुनावणी होणार आहे. याकडे सर्वोंचे लक्ष लागले आहे.
न्यायमूर्ती एन.व्ही. रामन्ना, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या तीन सदस्यीय खंठपीठासमोर सुनावणी होणार आहे. राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट मागे घेतली. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. राज्यपालांचा निर्णय रद्द करून २४ तासात बहुमत सिद्ध घेण्याचे आदेश देण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका महाविकास आघाडीतील पक्षांनी केली आहे.
निकाल विरोधात गेला तर असा बसू शकतो फटका…
भाजपसाठी फोडाफोडीचे राजकारण काही नवीन नाही. कर्नाटकात भाजपला आपले बहुमत सिध्द करावे लागणार होते. राज्यपालांनी दिलेल्या 15 दिवसांत आमदार फोडण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळणार होता. परंतु न्यायालयाने 15 दिवसांची मुदत अवघ्या 24 तासांवरच आणून ठेवली. त्यामुळे भाजपला अन्य पक्षातील आमदारांना आपल्याकडे आकर्षित करता आले नाही. परिणामी विधानसभेच्या सभागृहात मतदान प्रक्रिया घेण्यापूर्वीच मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला होता. अल्पमतातील सरकार संपुष्टात आले होते.