तेलंगणा : जगभरात कोरोनाने थैमान घातला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात 21 दिवस लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी तेलंगणा सरकारनं कठोर पावलं उचलायला सुरूवात केली आहे. नागरिकांनी कर्फ्यूचे पालन केले नाही तर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात येतील, असा इशारा मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिला आहे.
तेलंगणा सरकारने संध्याकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंतही ‘नाईट कर्फ्यू’ लागू केला आहे. पोलीस प्रत्येक नागरिकाला थांबवू शकत नाहीत. जर नागरिकांनी आदेश पाळले नाही तर लष्कराला पाचारण करण्यात येईल आणि दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात येतील, असा इशारा राव यांनी दिला आहे. “कृपया घरीच रहा, नाहीतर सर्वांना याचे परिणाम भोगावे लागतील. परदेशातून जे नागरिक आले असतील आणि विलगीकरणाचे नियम पाळत नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल,” असंही त्यांनी म्हटलं.