नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचारावर भाजपच्या नेत्यांनी प्रक्षोभक वक्त्यांबद्दल गुन्हे नोंदविण्यासंबंधी पोलीस आयुक्तांनी विवेकाने निर्णय घ्या आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी दिले होते. त्यानंतर मध्यरात्री न्या. एस. मुरलीधर यांची बदली करण्यात आली. दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या बदलीवर काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. काँग्रेसचे नेते आणि पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. काही प्रश्न विचारले आहे.
न्यायाधीश एस. मुरलीधर हे दिल्लीत द्वेष परसवणारी तसेच भावना भडकवणारी भाषणे देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात सुनावणी घेत होते. त्यांची रातोरात बदली करण्यात आली असे सुरजेवाला म्हणाले. सुरजेवाला यांनी यांची तुलना ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणाशी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधताना रणदीप सुरजेवाला यांनी तीन प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रश्नांची उत्तरे द्यावी असे आवाहन सुरजेवाला यांनी केले आहे.
१. आपल्या पक्षाच्या नेत्यांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी झाली, तर दिल्लीतील हिंसा दहशतवाद आणि अफरा-तफरीमध्ये तुमचा हात होता याचा पर्दाफाश होईल अशी तुम्हाला भीती होती का?
२. निष्पक्ष आणि योग्य न्याय होण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही किती न्यायाधीशांच्या बदल्या करणार आहात?
३. आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या द्वेष पसरवणाऱ्या वक्तव्याला योग्य ठरवण्याचा अन्य कोणता मार्ग नसल्याने तुम्ही न्यायाधीशांची बदली केली? (बदली करण्यात आलेल्या न्यायाधीशांनी भाजप नेत्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते)
भाजपच्या सरकारकडून न्यायपालिकेवर अशा प्रकारे दबाव टाकण्याची ही पहिलीच वेळ नसल्याचेही सुरजेवाला म्हणाले. या वेळी त्यांनी गुजरात दंगलीचा आवर्जून उल्लेख केला. गुजरात दंगलीत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात वकील असलेले सुप्रीम कोर्टाचे प्रसिद्ध ज्येष्ठ अॅडव्होकेट गोपाल सुब्रमण्यम याची नियुक्ती मोदी सरकारने सुप्रीम कोर्टाच्या कॉलिजीयमचया आदेशाची पर्वा न करता बळजबरीने रोखली होती असे सुरजेवाला म्हणाले. या व्यतिरिक्त सुरजेवाला यांनी उत्तराखंडमधील प्रकरणाचाही उल्लेख केला.