मुंबई : गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी दोन दिवसांपूर्वी जेएनयूतील हिंसाचाराविरोधात धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी काश्मिरमध्ये पाच महिण्यांपासून इंटरनेटसेवा बंद आहे. नेते नजरकैदेत आहेत. त्यामुळे ‘फ्री काश्मीर’चा फलक महक मिर्झा प्रभू या विद्यार्थिनीने झळकावला होता. त्यामुळे तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा चुकीचा आहे, असे स्पष्ट मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
महक मिर्झा प्रभू विरोधात भा. दं. वि. संहितेच्या कलम १५३ (बी) अन्वये मुंबई पोलिसांनी दाखल केला आहे. काश्मीरमध्ये सध्या इंटरनेटसह सर्व संवादमाध्यमे बंद केली आहेत, त्यापासून त्यांना फ्री करा, त्यांना मुक्तपणे संवाद साधू द्या, असे महक म्हणत होती. त्याला आझाद काश्मीरच्या घोषणेशी जोडणे ही पोलिसांची चूक आहे, असेही छगन भुजबळ यांनी नमूद केले.
तथ्य न आढळल्यास ते गुन्हा मागे घेऊ : गृहमंत्री अनिल देशमुख
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना महकवर दाखल केलेल्या एफआयआरनंतर पोलिस तिचा नक्की हेतू काय होता, याची चौकशी करतील व त्यात काही तथ्य न आढळल्यास ते गुन्हा मागे घेतील, असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला होता.