नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (CAA) तरुणांनी देशभर सुरू आहे. माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांनी मात्र या तरुणांचं कौतुकच केलं आहे. सहमती आणि असहमती लोकशाहीची मूलतत्त्वे आहेत. देशात नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या लाटेमुळे देशाच्या लोकशाहीची पाळेमुळे अधिक घट्ट होतील, असं प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे.
तरुणांची संविधानावरील आस्था आणि निष्ठा दिसून येते…
निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या पहिल्या सुकुमार सेन स्मृती परिसंवादामध्ये बोलताना माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न प्रणव मुखर्जी यांनी हे मत व्यक्त केलं. भारतीय लोकशाही काळाच्या प्रत्येक कसोटीवर उतरली आहे. गेल्या काही महिन्यांपासून लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यातही तरुणांनी रस्त्यावर उतरून त्यांचा आवाज बुलंद केला आहे. यातून या तरुणांची संविधानावरील आस्था आणि निष्ठा दिसून येत असून मनाला मोहित करणारी ही गोष्ट आहे, असं मुखर्जी म्हणाले.
सार्वमत ही लोकशाहीची जीवनरेषा आहे. लोकशाहीत सर्वांचं म्हणणं ऐकणं, विचार व्यक्त करणं, चर्चा करणं, तर्क-वितर्क मांडण्याबरोबरच असहमती व्यक्त करण्याचं महत्त्वाचं स्थान आहे. देशात सध्या शांततापूर्ण आंदोलनाची लाट आहे. त्यामुळे देशाची लोकशाही अधिकच घट्ट आणि मजबूत होईल, असं मला वाटतं, असंही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाज प्रक्रियेवरही भाष्य केलं. निवडणूक आयोग चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आयोगाने त्यांचा उद्देश पूर्ण केला आहे. निवडणूक आयोगाच्या बदनामीमुळे निवडणूक प्रक्रिया बदनाम होईल. जनतेचा जनादेश अटल असतो आणि त्याचं पावित्र्य सर्वोच्च आहे. हे पावित्र्य कायम राखणं हे निवडणूक आयोगाच्या हातात आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीला होत असलेल्या विरोधावरून भाजपने विरोधकांवर आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मुखर्जी यांनी तरुणांच्या आंदोलनाचं कौतुक केल्याने भाजपसाठी डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.