कोल्हापूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत. फडणवीस म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जीवावर राज्यात सत्ता आणेल, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना दिला होता का? असा शब्द बाळासाहेबांना दिला असता तर त्यांनी हा शब्द खपवून घेतला नसता, असं सांगतानाच मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत, असा टोला विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी लगावला.
विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या उपस्थित सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी कर्जमाफीवरून मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी ही केवळ औपचारिकता असून या कर्जमाफीने शेतकऱ्यांचा काहीही फायदा होणार नाही. ज्यांना गरज आहे, त्यांना तर या कर्जमाफीचा अजिबात फायदा होणार नाही. अशी टीका फडणवीस यांनी केली.
शेतकऱ्यांचं दीड लाखांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला होता. या सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. सातबारा सोडा या सरकारने केवळ पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला असून सरसकट कर्जमाफीच्या मुद्द्याला पाने पुसली आहेत. अतिवृष्टीमुळे पीडित झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये भरपाई देण्याचं आश्वासनही दिलं होतं. ही आश्वासनं ठाकरे सरकारने पूर्ण करावीत, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला.