नवी दिल्ली : देशात अर्थव्यवस्था घसरल्यामुळे केंद्र सरकारवर जोरदार टीका होत असतांना देशाचे माजी अर्थिक सल्लागार अरविंद सुब्रम्हण्यम यांनी देशाची अर्थव्यवस्था ICU मध्ये असल्याची टीका केली.
माजी अर्थिक सल्लागार अरविंद सुब्रम्हण्यम यांनी अमेरिकेतल्या एका विद्यापीठात दाखल केलेल्या रिसर्च पेपरमध्ये त्यांनी ही टीका केली. सुब्रम्हण्यम यांनी मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये सल्लागार म्हणून काम केलं होतं. नंतर त्यांनी राजीनामा देऊन संशोधन आणि शिकविण्याचं काम पुन्हा सुरू केलं. माजी आर्थिक सल्लागारानेच ही टीका केल्याने त्याला महत्त्व प्राप्त झालं.
रघुराम राजन यांनीही केली होती मोदी सरकावर टीका…
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली होती. हिंदू राष्ट्रवादाने फक्त सामाजिक तणाव वाढेल असं नाही तर देशाला आर्थिक विकासापासून दूर नेण्यातही याचा वाटा असेल असं परखड मत रघुराम राजन यांनी इंडिया टुडे मॅगझिनमध्ये मांडलं आहे. मोदी सरकारच्या सामाजिक आणि राजकीय धोरणांवरही त्यांनी मत व्यक्त केलं आहे.
रघुराम राजन म्हणाले की, सरकारने देशात राष्ट्रपुरुष आणि धार्मिक महापुरुषांचे मोठे पुतळे उभारण्याऐवजी अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या आधुनिक शाळा आणि विद्यापीठांची उभारणी केली पाहिजे. लहान मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी यामुळे मदत होईल.
भारताच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना रघुराम राजन म्हणाले की, देशाच्या आर्थिक विकासाचा आलेख घसरत चालला आहे. अर्थव्यवस्था कमकुवत झाल्याचं दिसत आहे. अशा परिस्थितीतही पंतप्रधान कार्यालयाकडून सर्व गोष्टी चालवल्या जात आहे. मंत्र्यांच्या हातात काहीच अधिकार नसल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केली आहे. सरकारमध्ये असलेल्यांमध्ये सत्ता अबाधित ठेवणं तसंच सर्वांवर नियंत्रण ठेवण्याची सवय असते आणि सध्याचं सरकारही त्याला अपवाद नाही असंही रघुराम राजन यांनी नमूद केलं.