मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत भेटीवर असतानाच राजधानी दिल्लीत हिंसाचार सुरु आहे. १० जणांचा जीव गेला आहे. जाळफोळ, दगडफेकीमुळे दिल्लीमध्ये नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. हिंसाचारावरून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर जोरदार शब्दांत निशाणा साधला आहे.
‘देशातील जनतेला भाजपकडून विकास मॉडेल अपेक्षित होते, गुजरातचे दंगल मॉडेल नाही’, असा टोला लगावत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप व केंद्र सरकारवर तोफ डागली. दिल्लीच्या जाफराबाद परिसरात सोमवार (२४ फेब्रुवारी) भडकलेल्या हिंसेनंतर संपूर्ण दिल्लीमध्ये तणावाचं वातावरण आहे. कालच्या हिंसाचारात दिल्लीच्या एका पोलीस शिपायासह १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
दिल्लीत गुजरातमधील २००२ ची पुनरावृत्ती होवू नये…
हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उत्तर-पूर्व दिल्लीच्या बऱ्याच भागांत कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडींवर जयंत पाटील यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. दिल्लीतील हिंसाचाराच्या घटना अत्यंत धक्कादायक असल्याचे पाटील यांनी नमूद केले. भाजपकडून देशातील जनतेला विकासाचं मॉडेल अपेक्षित आहे. गुजरातचं दंगल मॉडेल नाही, असे नमूद करताना दिल्लीत गुजरातमधील २००२ ची पुनरावृत्ती होवू नये याची काळजी राज्यकर्त्यांनी घ्यायला हवी, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस खबरदारी बाळगत आहेत, असं गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितलं. तसेच आझाद मैदानचा परिसर वगळता मुंबईत इतरत्र कोणत्याही ठिकाणी निदर्शने करण्याची कोणालाही परवानगी देण्यात येणार नाही.