रांची : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी निवडणुकीच्या काळात सत्तेत आल्यावर प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते कुणालाही १५ लाख रुपये मिळाले नाहीत. त्यामुळे एका व्यक्तीने या विरोधात न्यायालयात धाव घेतली. रांचीतल्या जिल्हा न्यायालयात या प्रकरणात सुनावणीला सुरुवात झाली आहे. उच्च न्यायालयाचे वकील एच.के.सिंह यांनी मोदी आणि शहांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
जिल्हा न्यायालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहांच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ४१५, ४२० अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोमवारपासून जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु झाली आहे. विशेष म्हणजे वकील एच.के.सिंह यांनी अमित शाहांच्या सुधारीत नागरिकत्व कायदा (CAA) विधानांचा दाखला दिला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जाहीरनाम्यात देशवासीयांना सीएए लागू करण्याचं वचन दिलं होतं. त्यामुळेच आम्ही निवडून आल्यावर (CAA) लागू केल्याचं शाह यांनी सांगितले होते. शाह (CAA) चे आश्वास पूर्ण करु शकतात. जाहीरनाम्यातल्या १५ लाखांचं वचन पूर्ण करु शकत नाहीत. असा सवाल उपस्थित केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवार (२ मार्च) ला होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.