मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाले. आज राज्याचा अर्थसंकल्प मांडल्याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प मांडला. शेती, शिक्षण, पाणी, उद्योग अशा सर्वच बाबतीत महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत. त्यामुळेच एका विचाराने तयार झालेल्या अर्थसंकल्पाने विरोधी पक्षाची चिंता मिटलेली असेल, असे म्हणायला हरकत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
सध्या देशात आर्थिक मंदीचे सावट आहे. त्यामुळे साहजिकच सर्वत्र निरुत्साहाचे वातावरण आहे. अर्थात त्यातून सगळ्या गोष्टींचा मेळ घालताना तारेवरची कसरत ही आली. या स्थितीतही आम्ही जो अर्थसंकल्प मांडल आहे तो पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. त्यासाठी आता दुसरे पुस्तक वाचण्याची गरज नाही, असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
फडणवीस यांनी ‘अर्थसंकल्प…सोप्या भाषेत’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झाले होते. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यातही चांगलीच टोलेबाजी रंगली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही विरोधकांवर टोलोबाजी केली होती.