मुंबई : महाराष्ट्रात वर्षअखेरीस मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. चंद्रकांत पाटील हे दिवास्वप्न पाहत आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार पाच वर्ष टिकेल आणि टिकणार आहे. असंही थोरात यांनी ठणकावून सांगितलं.
काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वापासून हळूहळू दूर नेत आहे. अगदी योजनाबद्धपणे हे सगळं सुरू आहे. मराठी माणूस आणि हिंदूंचा रक्षणकर्ता पक्ष अशी जी शिवसेनेची ओळख होती ती मनसेकडे जावी. महाराष्ट्रात शिवसेनेची जागा मनसेने घ्यावी, असा यामागचा डाव आहे. उद्धव ठाकरे यांनी हा डाव वेळीच ओळखावा, अस चंद्रकांत पाटील म्हणाले होते. पुण्यात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मी शिवसेनाचा हितचिंतक आहे, असे म्हणत शिवसेनेला न मागता अनेक सल्ले दिले. ‘नागरिकत्व कायदा देशातून कुणालाही बाहेर काढण्यासाठी केलेला कायदा नाही. हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी करण्यात आला आहे’, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्याकडे बोट दाखवत उद्धव ठाकरे या कायद्याशी सहमत असतील तर त्यांनी हा कायदा महाराष्ट्रात लागू करावा. महाराष्ट्रात या कायद्याविरोधात सुरू असलेली आंदोलने थांबवावी, असे आवाहन पाटील यांनी केले.
वीर सावरकरांवर काँग्रेसच्या नेत्यांकडून अत्यंत गलिच्छ असे आरोप करण्यात आले. तेव्हा शिवसेना शांत का बसली?, असा सवालही पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केला. भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना त्यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्याबाबत विचारले असता, हे घडलं तेव्हा मी दिल्लीत होतो. मला कळतात मी आशिषला फोन केला व त्याला दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले. त्यानुसार आशिषने दिलगिरी व्यक्त केली असून आता हा विषय संपला आहे, असे पाटील म्हणाले.
आमच्या सरकारच्या काळातील योजना रद्द करण्यात येत असतील तर त्याला आमची काहीच हरकत नाही मात्र एखादी योजना रद्द करत असताना त्याला पर्यायी योजना सुरू करायची असते, याचे भान सरकारने राखायला हवे, असे पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवलं जाणार अशी चर्चा आहे. त्याबाबत विचारले असता यात कोणतेही तथ्य नसल्याचे पाटील म्हणाले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत सुरुवातीला जे चित्र होते ते आता नाही. गेल्या तीन चार दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सभांचा धडाका सुरू असून दिल्लीत भाजपचे वारे वाहू लागलेत, असे पाटील म्हणाले होते.