मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मुंबई मेट्रो’साठी आरेमधील कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. त्यानंतर आरेच्या कारशेडवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली होती. आज रविवारी विधीमंडळातम मेट्रोच्या कारशेडसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी नवा पर्याय सुचवला आहे. ‘आरे’च्या बाजूलाच असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या परेड ग्राऊंडवर कारशेड होऊ शकते, अशी भूमिका त्यांनी मांडली.
पुन्हा कारशेडच्या मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधात विरोधीपक्ष असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. यापुढे एकाही झाडाचे पान तोडले जाणार नाही. आमचा विरोध मेट्रोला नाही, तर पर्यावरणाच्या ऱ्हासाला आहे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली होती. विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरु झाल्यानंतर नवाब मलिक यांनी मुंबई मेट्रोबाबत गैरसमज पसरवला जात असल्याचा आरोप केला. आरेच्या बाजूलाच असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या परेड ग्राऊंडवर कारशेड होऊ शकते, अशी भूमिका त्यांनी मांडली.
कारशेडसाठी 30 हेक्टर जागेची गरज आहे. एसआरपीएफ कँम्पमध्ये 41 हेक्टर जागा असून मुख्यमंत्र्यांनी या जागेचा विचार करावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी आज सभागृहात केली. आमदार नवाब मलिक यांनी नवा पर्याय सुचवत मार्ग काढला आहे.
देवेंद्र फडणवीसांचा होता ड्रीम प्रोजेक्ट…
मुंबई मेट्रो हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. मेट्रोचे कारशेड आरेमध्ये प्रस्तावित केल्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. पर्यावरणप्रेमींनी उग्र आंदोलने केली. मात्र सरकारने ही आंदोलने चिरडून टाकली. त्यानंतर एका रात्रीत सरकारने प्रस्तावित जागेवर आवश्यक असणारी सर्व झाडे कापून टाकली होती.
रात्रीच्या अंधारात झाडे कापल्यामुळे एकच जनक्षोभ उसळला होता. त्यावेळी सत्ता आल्यानंतर आरेला जंगल म्हणून घोषित करु, अशी भूमिका शिवसेनेने मांडली होती. मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बसल्यानंतर ते आरेबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष होते. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी कारशेडच्या कामाला स्थगिती दिली.