मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपचा डाव असून, दिल्लीहून सूत्र हलवली जात आहेत. जर असा प्रकार घडला तर हा शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान होईल. शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम आहे. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितलं.
भाजप हा सर्वात मोठा पक्ष असून राज्यपालांनी त्यांना बोलावलं पाहिजे. हे राज्यपालांचा कर्तव्य आहे. असेही संजय राऊत म्हणाले. मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर उद्धव ठाकरे ठाम आहेत. नितीन गडकरी शिष्टाई करणार का? असं विचारलं असता, मुख्यमंत्रीपदाचं लेखी पत्र घेऊन नितीन गडकरी येणार असतील तर माध्यमांचा निरोप मी उद्धव ठाकरेंना देतो असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नितीन गडकरी मुंबईत येत आहेत त्यात काय नवल. त्यांच वरळीत निवासस्थान आहेत. ते मुंबईत येऊ शकता असंही संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात कर्नाटकप्रमाणे घोडेबाजार होईल का? असं जर माध्यमांना वाटत असेल तर महाराष्ट्रात पारदर्शकता शिल्लक नाही असंच म्हणावं लागेल असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र कधीही कोणाही समोर झुकणार नाही. शरद पवार जसे कोणाही समोर झुकले नाहीत तसंच उद्धव ठाकरेही कोणाही समोर झुकणार नाहीत असंही संजय राऊत म्हटले आहेत.
शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे मातोश्रीवर आले होते त्यांना भेट नाकारण्यात आली का? असा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हाही मध्यस्थीसाठी कोणीही येण्याची गरज नाही असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस आमदरांना बाहेर हलवण्यात आलं असा प्रश्न विचारला असता ही वेळ का आली. काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना आम्ही सर्व एकत्र आहोत असंही संजय राऊत म्हणाले.