मुंबई : ज्यांच्या हाती देशाची सत्ता आहे ते ठराविक समाजाचा विचार करून निर्णय घेण्याचे काम करत आहेत. बहुसंख्य लोकांना याची जाणीव नाही. परंतु राज्यातील सर्व समाज घटकांना योग्य न्याय कसा मिळेल याची जबाबदारी राज्य सरकारची असेल व ती चोखपणे पार पाडण्यात येईल,’ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलची बैठक आज गुरुवार (२२ जानेवारी) मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संघटनेतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, ना. नवाब मलिक, ना. जयंत पाटील, खासदार माजीद मेमन, मुनाफ हकीम यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
मागास वर्गियांसाठी अधिकारांचा योग्य वापर कसा करायचा याची नीती आपण ठरवू. यासाठी तुमच्या सर्वांची साथ मिळण्याची गरज आहे. राज्यातील सर्व समाज घटकांना योग्य न्याय कसा मिळेल याची जबाबदारी राज्य सरकारची असेल व ती चोखपणे पार पाडण्यात येईल. pic.twitter.com/iAta2X0dZq
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 23, 2020
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, मला आनंद आहे की मुस्लीम समाजाने विधानसभा निवडणुकीत भाजपला मत दिलं नाही. जो भाजपचा पराभव करू शकतो अशाच पक्षांना मत देण्याचं काम मुस्लीम समाजाने केलं. केंद्र सरकारचे आज समाजातील मागासलेल्या वर्गाकडे लक्ष नाही. या वर्गासाठी परिवर्तन करण्याचे काम आपण केले पाहिजे. ज्यांच्या हाती देशाची सत्ता आहे ते ठराविक समाजाचा विचार करून निर्णय घेण्याचे काम करत आहेत. बहुसंख्य लोकांना याची जाणीव नाही,’ असं म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं.
आज तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन केली आहे. आपल्या पक्षाने लहान घटकांना न्याय मिळण्यासाठी सामाजिक न्याय व अल्पसंख्याक विभागाची जबाबदरी आग्रहाने स्वतःकडे घेतली आहे. राज्यातील सर्व लहान घटकांना शिक्षण, सुविधा, महिला सुरक्षा अशा सर्व गोष्टीत बळकटी मिळण्याचा प्रयत्न यातून होईल,’ अशी आशा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. तसंच ‘मागास वर्गीयांसाठी अधिकारांचा योग्य वापर कसा करायचा याची नीती आपण ठरवू. यासाठी तुमच्या सर्वांची साथ मिळण्याची गरज आहे. राज्यातील सर्व समाज घटकांना योग्य न्याय कसा मिळेल याची जबाबदारी राज्य सरकारची असेल व ती चोखपणे पार पाडण्यात येईल,’ असा विश्वासही पवारांन व्यक्त केला आहे.
‘जनगणनेत प्रत्येकाच्या जन्माची नोंद करण्याचा निर्णय होत आहे. जन्म झालेल्या गावाची देखील नोंद होईल असे पाहण्यात येत आहे. पण जो भटका समाज आहे त्याच्या जन्माची कोणती नोंद असेल का? त्याला भारतीय नागरिकत्व मिळेल का? नाहीतर त्याच्यावर अन्याय होणार आहे,’ असं म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारने आणलेल्या CAA आणि NRC कायद्यावर जोरदार टीका केली आहे.