औरंगाबाद : शिवसेनेचे उपनेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजप नेते आशिष शेलार यांनी इशारा दिला. खैरे म्हणाले आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर व एकनिष्ठ शिवसैनिक आहोत. उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल बोलतांना भाजपच्या नेत्यांनी भान ठेवावे. शिवसैनिकांची खोपडी सरकली, तर आशिष शेलार यांना मुंबईत येऊन ठोकून काढू असा इशारा दिला.
शिवसेना पक्ष प्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात एनआरसी लागू होणार नाही. अशी भूमिका मांडल्यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी ‘तुझ्या बापाचे राज्य आहे का’ अशी टीका केली होती. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे नेते शेलारांवर चांगलेच संतापले आहेत.
सत्ता नसल्यामुळे भाजपच्या नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे भाजपचे नेते नको त्या विषयावर बरळत आहेत. शिवसैनिक कडवट असतो, तो शांत आहे तोपर्यंत ठीक, पण एकदा खोपडी फिरली तर शेलार तुमची खैर नाही. उलटसुलट विधान किंवा अपशब्द काढले तर आम्ही मुंबईत येवून ठोकून काढू हे त्यांनी लक्षात ठेवावे असा इशारा खैरे यांनी दिला आहे. त्यामुळे पुढे शिवसेना विरुध्द भाजप असा संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.