नवी मुंबई : वर्धा आणि औरंगाबादच्या जळीत कांडानंतर नवी मुंबईतही धक्कादायक घटना उघड झाली आहे. नवी मुंबईतील पनवेलमधील दुन्द्रे या गावात एका ५५ वर्षीय महिलेला जाळून टाकले नंतर फासावर लटकावून निर्घृण हत्या करण्यात आली.
शारदा माळी असे या मृत महिलेचे नाव असून मारेकऱ्यांनी शारदा माळी यांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही काळानंतर दुर्घंधी पसरू लागल्याने मारेकऱ्यांनी त्या महिलेला फासावर लटकावत तिची अमानूषपणे हत्या केल्याचा आरोप शारदा माळी यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या कृत्यात पाच लोक असल्याचा संशय असून हे सर्व संशयित आरोपी फरार झाले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
दरम्यान, औरंगाबाद जळीत कांडातील पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. औरंगाबादच्या सिल्लोडमधील अंधारी गावात या महिलेला गावातील बिअरबार मालकाने घरात घुसून पेटवलं होतं. या बरोबरच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील पीडित शिक्षिका मृत्यूशी झुंज देत आहे. या सर्व प्रकारामुळे राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.