नाशिक : टायर फुटून एसटी महामंडळाची धुळे- कळवण बस शेजारून जाणा-या अँपे रिक्षावर आदळली होती. त्यानंतर रिक्षा व बस रस्त्याजवळच्या शेतातील खोल विहिरीत पडून झालेल्या भीषण अपघातात २६ जण ठार झाले. ३६ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी झाला. काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील मेशी फाट्यावर धोबी घाट परिसरात झालेल्या बस आणि रिक्षा अपघातातील मृतांचा आकडा २६ वर गेला आहे तर ३६ जण जखमी आहेत. मध्यरात्री २ वाजेपर्यंत विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू होतं. अपघातातील जखमींवर सध्या मालेगावातील जिल्हा रुग्णालयासह इतर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्या बसमधील प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. तर रिक्षामधील अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जास्तीत जास्त आर्थिक मदत केली जाईल असं आश्वासन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलं आहे.
मालेगाव-देवळा रोडवरील मेशी फाट्यावर धोबी घाट परिसरात मंगळवारी ( २८ जानेवारी ) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर एसटी बस आणि रिक्षा दोन्ही वाहनं थेट विहिरीत कोसळली होती. त्यानंतर पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलं. या अपघातात बस आणि रिक्षाचा अक्षरश: चुराडा झाला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. काही वेळात पोलीस आणि बचाव पथकही तेथे दाखल झालं. मात्र दोन्ही वाहनं विहिरीत कोसळल्याने बचावकार्यात अनेक अडथळे येत होते. त्यानंतर बसची मागची काच फोडून ३३ प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफची टीम यांनी स्थानिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी बस धुळ्यावरून कळवणच्या दिशेने जात होती. तर रिक्षा मालेगावच्या दिशेने जात होती. बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने, बस थेट समोरुन येणाऱ्या रिक्षाला धडकली. मात्र बसचा वेग जास्त असल्याने रस्त्यापासून २० ते २५ फूट अंतरावर असलेल्या विहिरीत दोन्ही वाहनं कोसळली. बसमध्ये चालक, वाहकासह ४६ प्रवासी होते. तर रिक्षात ९ प्रवासी होते. या अपघातात बस चालकाचाही मृत्यू झाला.
बचाव कार्य अधिक वेगाने व्हावे यासाठी एनडीआरएफच्या जवानांची मदत घ्यावी तसेच मृत व जखमींच्या नातेवाईकांना सर्व आवश्यक सहाय्य करावे असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 28, 2020
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपघातानंतर शोक व्यक्त केला असून जखमींना तातडीने योग्य ती वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांना आवश्यक तो सर्व औषधोपचार देण्याचेही त्यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितलं आहे. जखमींवर देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी व ९ डॉक्टरांची टीम यावर लक्ष ठेवून आहेत.
परिवहन मंत्री अनिल परब भेटीला…
परिवहन मंत्री अनिल परब आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री जखमींची आणि मृतकांच्या भेटसाठी दाखल झाले आहेत. मृतकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपयाची मदत सरकारने जाहीर केली आहे.
रिक्षामधले प्रवासी मुलासाठी मुलगी पाहून येत होते…
मालेगाव तालुक्यातील येसगाव येथील अझीम मन्सुरी यांचा मोठा मुलगा उस्मान मुंबईत बस चालक आहे. उस्मानचे आठवडाभरापूर्वीच धुळे येथील हुसेन मन्सुरी यांची कन्या शबनमशी लग्न ठरले. दुसरा मुलगा रशीदला स्थळ बघायला देवळा येथे कुटुंबीय रिक्षाने गेले होते. परततांना ते अपघातात मरण पावले.