विरार : मुंबईत बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेने महामोर्चा काढला होता. या मोर्चाच्या प्रभावाने बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींविरोधात पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. विरारच्या अर्नाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या २३ बांगलादेशी संशयितांवर विरार पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याविरोधात अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.
२३ बांगलादेशी विरारमध्ये बेकायदेशीररित्या राहत असल्याच्या संशयावरून कारवाई करत पोलिसांनी त्यांना अटक केली. अनैतिक मानवी वाहतूक, पालघर दहशतवाद विरोधी पथक आणि अर्नाळा पोलिसांनी संयुक्त कारवाही करत बांगलादेशींना अटक केली. विरारच्या अर्नाळा, कळंब, राजोडी परिसरातून मध्यरात्री सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांच्या कारवाईत १० महिला, १२ पुरुष आणि एका अल्पवयीन बांगलादेशी मुलाचा समावेश आहे. अटक केलेले सर्व संशयित बांगलादेशी विरार परिसरात भंगार विकण्याचे आणि मोलमजुरी करण्याचे काम करतात, अशी माहिती अर्नाळा सागरी पोलिसांनी दिली आहे.