महाराष्ट्र आणि हरियाणात विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. महाराष्ट्रात २८८ जागांसाठी तर हरयाणात ९० जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. दोन्ही राज्यात भाजपाची सत्ताअसून सत्ता टिकवण्यासाठी आज भाजपाची अग्नीपरिक्षा आहे.
दोन्ही राज्यांमध्ये सत्ताधारी पक्षाविरोधात अँटी इनकम्बन्सीचा फटका बसू शकतो. सत्ताधा-यांच्या विरोधात मतदारांचा रोष असतो. त्यामुळे सत्ताधा-यांना भीती असते, तर विरोधकांना त्याचा फायदा होतो. महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली तर हरियाणात मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्त्वात पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
सरकारविरोधी लाटेचा अँटी इनकम्बन्सी आपल्यासाठी चांगला परिणाम होईल अशी आशा विरोधकांना आहे. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेने आपल्यातील मतभेद दूर करून शेवटी युती केली निवडणुकीला सामोरे गेले. तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीकरून निवडणूक लढत आहेत.
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष एकूण १६४ जागा लढवत आहे. तर शिवसेना एकूण १२६ जागांवर निवडणूक लढवत आहे. भारतीय जनता पक्षाचे सबहकारी पक्ष हे भारतीय जनता पक्षाच्याच निवडणूक चिन्हावर ही निवडणूक लढत आहेत. तर, दुसरीकडे काँग्रेस १४७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १२१ जागा लढत आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकूण १०१ जागा लढवत आहे. तर, डाव्या पक्षांपैकी सीपीआयचे १६ तर सीपीएमचे ८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
हरियाणात मुख्यमंत्री खट्टर यांच्या नेतृत्त्वात भाजपने ९० पैकी एकूण ७५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या विधानसभेत भाजपचे एकूण ४८ आमदार आहेत. मतदार काय निर्णय घेतात हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल. मात्र, सत्ताधा-यांची ही खरीच अग्नीपरिक्षा आहे.