नागपूर : नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात आज दुस-या दिवशीही गोंधळ उडाला. भाजपने पहिल्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्दयावरून सभागृहाचं कामकाज बंद पाडल्यानंतर, आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात, शेतकऱ्यांच्या मदतीवरुन आक्रमक पवित्र्याने केली. भाजपने सामनातील बातमी दाखवत शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याची मागणी केली. यावेळी बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजापचे औसा मतदारसंघातील आमदार अभिमन्यू पवार यांच्यात धक्काबुक्की झाली.
दोन्ही आमदारांमधील वाद सोडवण्यासाठी भाजप आमदार आशिष शेलार, गिरीश महाजनांनी मध्यस्ती केली. याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही धावत जाऊन मध्यस्थीचा प्रयत्न केला. सभागृहात शिवसेना भाजप आमदार आमनेसामने आल्यानंतर देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रवींद्र वायकर समजूत घालण्यासाठी धावून आले.
भाजपच्या आमदारांनी आज सकाळपासूनच शेतकरी मदतीवरुन आक्रमक पवित्रा घेतला. सभागृहातही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार देण्याची मागणी करताना, अनेक चिमटे काढले. यादरम्यानच, तिकडे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजापचे औसा मतदारसंघातील आमदार अभिमन्यू पवार यांच्या मारामारी झाली.
भाजपचं शेतक-यांसाठी आंदोलन…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याची मागणी केली होती, मग आता तेच मुख्यमंत्री आहेत, त्यांनी तातडीने शेतकऱ्यांना 25 हजाराची मागणी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आमदारांनी केली.
पुरवणी मागण्यांमध्ये हेक्टरी 25 हजार रुपयांच्या तरतुदीचा उल्लेख नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याची सरकारची भावना नाही, असा आरोप फडणवीसांनी केला. भाजपने सामनातील बातमी दाखवत आंदोलन केलं.