नागपूर: विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ आता वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रॅली काढण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत आजपासून नागपूरच्या संविधान चौकातून ‘सत्ता संपादन महारॅली’ला प्रारंभ झाला आहे. नागपूर, हिंगणा, वर्धा, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशीम या मार्गे रॅली जाईल. मार्गातील प्रमुख शहरात सभा होणार आहेत. १८ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे समारोप होणार आहे.
एमआयएमने वंचितमधून फारकत घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची ही पहील सत्ता संपादन रॅली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी समविचारी संघटना व एमआयएमसह अन्य पक्षांनी एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. लोकसभा निवडणुकीत आघाडीला उल्लेखनीय मते मिळाली. आता विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असताना एमआयएमने दोन दिवसांपूर्वी आघाडीतून माघार घेतली. असे असले तरी वंचितने पूर्ण उत्साहात यात्रेची तयारी केली आहे. अण्णाराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या रॅलीत जिल्ह्यातील नेते सहभागी होणार आहेत. रॅलीसाठी खास रथ तयार करण्यात आला आहे. नागपूर, हिंगणा, वर्धा, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशीम या मार्गे रॅली जाईल. मार्गातील प्रमुख शहरात सभा होणार आहेत. १८ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे समारोप होणार आहे.