नागपूर : नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तीव्र शब्दांत निषेध केला. ‘देशातील तरुणांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. युवाशक्तीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारत हा तरुणांचा देश असून त्यांची शक्ती एखाद्या बॉम्बसारखी आहे. त्या बॉम्बची वात पेटवू नका,’ असा घणाघात मोदी सरकारवर उध्दव ठाकरे यांनी केला.
‘तरुणांचं आंदोलन चिरडून देशात पुन्हा एकदा ‘जालियनवाला बाग’ घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ अशी तोफ उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर डागली. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभेत आज शिवसेना व भाजपच्या आमदारांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध नोंदवतानाच विरोधकांना खडे बोल सुनावले. नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशात सध्या आंदोलनाचा वणवा पेटला आहे. केंद्र सरकारनं ही आंदोलनं चिरडण्याची भूमिका घेतल्याचं चित्र आहे. त्यावरून उद्धव यांनी सरकारवर टीका केली.