अकोला : काळजीवाहू सरकार चालवताना काही बंधन असतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी सरकार स्थापन होणे गरजेचं आहे. अशी हतबलता काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
देवेंद्र फडणवीस यांनी निकालाच्या दिवशी ‘युतीचच’ सरकार स्थापन होईल असं ठासून सांगितलं होतं. परंतु सध्या शिवसेना भाजपामध्ये सत्तेच्या वाटपावरून संघर्ष सुरु आहे. आज अकरा दिवस उलटले असून सत्ता स्थापन करण्यात आली नाही. यामुळे राज्यातील जनतेचंही लक्ष या दोन्ही पक्षांकडे लागले आहेत. मात्र आज अकोला दौ-यानिमित्त फडणवीसांच्या चेहऱ्यावर यावरुन तणाव दिसून आला.
राज्यातील शेतक-यांची अवस्था अवकाळी पावसामुळे वाईट झाली आहे. राज्यात सध्या काळजीवाहू सरकार आहे. त्यामुळे काही निर्णय घेताना बंधनं येतात. आम्ही त्याच पध्दतीने काही निर्णय सध्या घेत आहोत. मात्र, सरकार स्थापन होणे गरजेचं आहे. असेही, फडणवीस यांनी सांगितले.