नागपूर : दुचाकीसोबत कंपनीने २ हेल्मेट देणे बंधनकारक आहे. दोन हेल्मेट ग्राहाकांना दिले नाही तर वाहनांची नोंदणी होणार नाही. याबाबत परिवहन आयुक्तांनी अंमलबजावणी करावी आणि सहा आठवड्यात अहवाल सादर करावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.
नवीन दुचाकीची खरेदी केल्यानंतर वाहन वितरकाने दुचाकीसोबत खरेदीदाराला दोन हेल्मेट देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या वितरकांवर कारवाई करण्यात येणार आहे. केंद्रीय मोटर वाहन अधिनियम, १९८९ नुसार एक हेल्मेट वाहनचालकाला देणे बंधनकारक आहे. वाहनचालकाला हेल्मेट न दिल्यास कलम १७७ अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद आहे. परिवहन विभागाने २०१६ मध्ये एक परिपत्रक काढले असून, यात ‘नवीन दुचाकी घेणाऱ्या ग्राहकाला दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे,’ असे स्पष्ट करण्यात आले आहे. हे परिपत्रक राज्यातील सर्व वाहन वितरकांना लागू आहे. मात्र, या परिपत्रकाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी सूचना परिवहन विभागाचे आयुक्त शेखर चन्ने यांनी केली आहे.
परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशावर बोजा पडणार की हेल्मेटचा खर्च वितरकांना करावा लागणार, याबाबत आदेशात स्पष्टता नाही. दरम्यान, हे हेल्मेट उत्पादकाने वितरकांना देणे अपेक्षित आहे. मात्र, उत्पादकाकडून हे हेल्मेट दिलेच जात नाही. अशीही माहिती समोर आली आहे.