भीमा कोरेगाव: कोरेगाव भीमाच्या लढाईत मिळवलेल्या विजयाला आज २०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभावर आज शौर्यदिन साजरा केला जातोय. यावेळी लाखो नागरिकांनी ठिकठिकाणाहून हजेरी लावली.
ब्रिटीशांच्या सैन्यात असलेल्या महार रेजिमेंटने यादिवशी पेशव्यांच्या सैन्याचा भीमा नदीच्या काठावर पराभव केला होता. पेशव्यांच्या विशाल सैन्याचा या ३०० सैनिकांनी पराभव केला. त्या युद्धाच्या स्मरणार्थ हा स्तंभ उभारण्यात आलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी १ जानेवारी या विजयस्तंभाला जाऊन वंदन करत असतं. या घटनेला आज २०० वर्ष पूर्ण झाली आहेत. दरवर्षी या विजयस्तंभाला दर्शन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंबेडकरांच्या विचारांचे अनुयायी येत असतात.यावर्षीही मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. यावेळचं वैशिष्ट्य म्हणजे गुजरातमध्ये आपली चमक दाखवणारे तरूण नेते जिग्नेश मेवानीही उपस्थित आहेत. तसंच डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचे नातू आणि भारिपचे नेते प्रकाश आंबेडकरही उपस्थित आहेत. मोठ्या प्रमाणात पुरोगामी संघटनांनी या विजयोत्सवाला उपस्थिती दर्शवली आहे. यावेळी आमची सरकारविरोधी लढाई सुरूच राहणार असं वक्तव्य जिग्नेश मेवानी यांनी केलं आहे.