युतीच्या जागा वाटपात भाजपाने मित्र पक्ष शिवसेनेला दिलेल्या जागा वाटपा वरून गोंधळ झाला आहे. शिवसैनिक संतप्त झाले आहेत. नेहमी मोठा भाऊ असणा-या शिवसेनेच्या पाठित भाजपाने जागावाटपात खंजीर खूपसल्याने सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. महत्वाच्या नवी मुंबई,पुणे,नाशिक आणि नागपूरमध्ये शिवसेनेला एकही जागा सोडली नाही. त्यामुळे भाजपला दगा फटका होण्याची शक्यता आहे.
युतीच्या अद्यापही जागा वाटपाचा गु-हाळ संपलेला नाही. काल दोन्ही पक्षांनी काही उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आणि राडा सुरु झाला. जागा वाटपात गोंधळ उडाल्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. ही गोष्ट दोन्ही पक्षांच्या नेत्यांना माहित होती त्यामुळे उशीरा उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या. विशेष म्हणजे शिवसेनेने तर उमेदवारांचे नावही जाहीर केले नाही. फक्त कोणता मतदारसंघ शिवसेनेला सुटला तेवढाच उल्लेख केला.
भाजपा 164 जागा तर शिवसेना 124 जागांवर निवडणूक लढविणार आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपाने एकत्र येत निवडणुकीचा सामना केला. लोकसभा निवडणुकीत राज्यात मिळालेलं यश पाहता भाजपा-शिवसेनेला विधानसभा निवडणुकीकडून मोठी अपेक्षा आहे. सुरुवातीला जागावाटपावरुन शिवसेना-भाजपात यांच्यात छुपा संघर्ष सुरु असल्याचं बोललं जातं होतं. शिवसेनेने भाजपासोबत युती करण्यासाठी 50-50 फॉर्म्युल्याची मागणी केली होती. त्या शिवसेनेला पुणे, नाशिक, नवी मुंबई, नागपूरसारख्या शहरांमध्ये एकही जागा शिवसेनेला देण्यात आली नाही त्यामुळे भाजपाने शिवसेनेला शहरातून संपविण्याचा डाव केलाय का? अशीच चर्चा आता सगळीकडे सुरु आहे.
मागील निवडणुकीत भाजपाला 122 जागा, शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या. यातील बहुतांश विद्यमान जागा दोन्ही पक्षांनी आपल्याकडेच ठेवल्याचं दिसून आलं. पुणे शहरातील 8 जागांमध्ये सर्व जागा भाजपा लढविणार आहे. याठिकाणी 2 जागा शिवसेनेला सोडाव्यात अशी मागणी होत असतानाही शिवसैनिकांच्या पदरी निराशा पडली आहे.
नाशिक शहरातही तीच परिस्थिती आहे. नाशिक मध्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम या सर्व जागी भाजपाचेच उमेदवार रिंगणात असतील. तर नागपूरमध्ये शिवसेनेला एकही जागा सोडली नाही, नवी मुंबईत बेलापूर, ऐरोली मतदारसंघातही भाजपाचेच उमेदवार आहे. त्यामुळे या शहरांमधील शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात नाराजी दिसू लागली आहे. याचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता आहे.