जालना : जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची आज (६ जानेवारी) निवडणूक होती. निवडणुकीत भाजपा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री बबनराव लोणीकर, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे याची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र महाविकास आघाडीसमोर आज भाजपने सपशेल माघार घेतली. उमेदवार दिलेच नाही त्यामुळे भाजपाच्या या भूमिकेमुळे जालना जिल्हा परिषदेत महाविकासआघाडीची सत्ता आली.
जालना जिल्हा परिषदेत भाजपाचे सर्वाधिक २२ सदस्य असतानाही मागील निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी- काँग्रेस सोबत संयुक्त आघाडी करत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवले होते. याचा वचपा घेण्याच्या दृष्टीने भाजपने कंबर कसली होती. जालना जिल्हा परिषदेत महाविकासआघाडीकडे ३४ हा आकडा असल्यामुळे आघाडीचा पारड जड होत. त्यामुळे सत्ता कायम राहिली. भाजपने माघार घेतली.
येथील जिल्हा परिषदेत अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाने उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. त्यामुळे महाविकासआघाडीचे उत्तम वानखेडे यांची जिल्हापरिषद अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. माझा एकमेव फार्म जिल्हापरिषद अध्यक्षपदासाठी दाखल झालेला असल्याने, माझी बिनविरोध निवड झाली, याबद्दल मी सर्व नेत्यांचे व महाआघाडीचे मी आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया उत्तम वानखेडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
महाविकासआघाडीतील शिवसेनेचे सदस्य असलेल्या उत्तम वानखेडे यांचा उमेदवारी अर्ज दुपारी १ वाजेपर्यंत दाखल झाला होता. तर, अर्ज दाखल करण्याच्या वेळेपर्यंत भाजपाचा कोणताही उमेदवारी अर्ज आला नव्हता. याला कारण, पुरेसं संख्याबळ भाजपाकडे नव्हतं. भाजपाकडून माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे व भाजपा नेते बबनराव लोणीकर यांनी प्रयत्न केले. मात्र, संख्याबळाचा आकडा न जुळल्याने अखेर भाजपाने माघार घेतली. जालना जिल्हापरिषदेत सध्या भाजपा – २२, शिवसेना – १४, राष्ट्रवादी -१३, काँग्रेस -५ व अपक्ष – २ असे संख्याबळ आहे.