औरंगाबाद: २३ मार्च रोजी औरंगाबाद येथे सरकारच्या तिहेरी तलाक बिलाच्या विरोधात, मुस्लिम महिलांच्या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा शुक्रवारी, २३ मार्च रोजी दुपारी तीन वाजता आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत धडकणार आहे. विभागीय आयुक्तांना निवेदन सादर करण्यात येईल. अशी माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड च्या भूमिकेला पाठिंबा म्हणून हे आंदोलन होणार आहे. सदरहू बिल हे इस्लामी कायदा (शरियत) च्या विरोधात आहे. म्हणून त्याच्या निषेधार्थ देशभर सुरू असलेल्या महिलांच्या चळवळीचा हा एक भाग आहे. सरकारी ट्रिपल तलाक बिल हे घटनेच्या विरोधात आहे. तसेच मुस्लिम महिलांच्या देखील विरोधात असल्याने सर्व महिलांचा याला विरोध होत आहे. सरकारने ट्रिपल तलाक बिल त्वरित परत घ्यावे,या मागणीचे निवेदन महिला प्रतिनिधी कडून विभागीय आयुक्तांना देण्यात येणार आहे. या मोर्चाला,धरणे व आंदोलनाला कसलेही गालबोट लागू नये म्हणून संयोजकांनी १००० पुरुष स्वयंसेवक तसेच ५०० महिला स्वयंसेवक नियुक्त केलेले आहेत. लहान मुलांना यात सामील करू नये,एकाच ठिकाणी गर्दी करू नये,परतीच्या वेळेस शिस्तीचे पालन करावे असे सांगितले आहे. मोर्चा मध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून,जवळील स्वयंसेवकाकडे पाण्याची मागणी करता येईल. या मोर्चा मध्ये लाखोंच्या संख्येने,विशेषतःमुस्लिम महिलांनी जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे असे आवाहन ट्रिपल तलाक विरोधी मुस्लिम महिला मोर्चा समन्वयक समितीने केले आहे. या पत्रकार परिषदेत फहीमुन्नीसा,शाकेरा खानम,शाहिस्ता कादरी,शबाना आईमी,कमर सुलताना, मुबश्शीरा फिरदौस,माहरुख फातेमा,फ़ातेमा फिरदोस शबीना बानो,खालिदा उमतुल अज़ीज़ उपस्थित होते.