मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा सोमवारी विस्तार झाला. मात्र, खाते वाटपावरून सध्यातरी घोडे अडले आहेत. परंतु त्यापूर्वी तत्पूर्वी मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचं वाटप झालं आहे. गेल्या महिन्यात चार मंत्र्यांना बंगल्यांच वाटप झाल्यानंतर, आता विस्तारानंतर सर्वांना बंगले मिळाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाट्याला देवगिरी बंगला आला आहे. तर अशोक चव्हाण यांना मेघदूत, दिलीप वळसे पाटील यांना शिवगीरी, अनिल देशमुख यांना ज्ञानेश्वरी तर डॉ. राजेंद्र शिंगणे-सातपुडा आणि राजेश टोपे यांना जेतवन हे बंगले मिळाले आहेत. इतर नेत्यांना कोणते बंगले मिळाले. ते जाणून घेऊ या.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील पहिल्या विस्तारात शपथ घेणाऱ्या सर्व ३६ जणांना सरकारी बंगल्यांचं वाटप झालं आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा तर छगन भुजबळ यांना रामटेक, जयंत पाटील यांना सेवासदन आणि एकनाथ शिंदे यांना रॉयलस्टोन हे बंगले मिळाले आहेत.
सत्ताकेंद्र असलेल्या ‘मातोश्री’ वर राहणारे आदित्य ठाकरे यांना अ-६ निवासस्थान मिळालं आहे. बच्चू कडू यांना रॉकिहिल टॉवर १२०२, विश्वजीत कदम यांना निलांबरी ३०२, सतेज पाटील यांना सुरुची-३, आदिती तटकरे यांना सुनिती -१० हे निवासस्थान मिळालं आहे.
मंत्र्यांना बंगले मिळाले मात्र, खातेवाटप कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्र्यांच्या खातेवाटपावरून कुरबूर सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे हा तोडगा कधी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना सागर बंगला…
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेत्याचा बंगला मिळाला आहे. गेल्या महिन्यात देवेंद्र फडणवीस यांना सागर हा बंगला मिळाला. हा बंगला मलबार हिल परिसरातच आहे.