मुंबई : महाराष्ट्र नवर्निमाण सेना (मनसे) चा नवा झेंडा लाँच करण्यात आला. हा झेंडा भगव्या रंगाचा असून त्याच्यावर राजमुद्रेचा वापर करण्यात आला. मराठा संघटना, संभाजी ब्रिगेड संघटनेनंं यावर आक्षेप घेतला असून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यामुळे महाराष्ट्र नवर्निमाण सेना ( मनसे ) वादात अडकली आहे.
गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे आज ( गुरुवार २२ जानेवारी ) एकदिवसीय महाअधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या नवा झेंडा लाँच करण्यात आला आहे. मनसेला अपयश आल्यामुळे मनसे आपल्या भूमिकेत बदल करणार अशी जोरदार चर्चा होती. त्यामुळे १४ वर्षानंतर मनसे पक्षाचा झेंडा बदलला आहे. पक्षाचा नवा झेंडा भगव्या रंगाचा असून त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे.
महाअधिवेशनात मनसे वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. मनसेची ९ मार्च २००६ मध्ये स्थापना झाली. परंतु २००९ मध्ये मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. तो अपवाद सोडून मनसेला अद्यापही यश मिळाले नाही. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही मोठे बदल करणार असून पक्षाचा झेंडाही बदलणार असल्याचं बोललं जात होतं.
मराठी मुद्यानंतर अपयश आल्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्यांकडे वाटचाल…
मनसेची १४ वर्षापूर्वी स्थापना झाल्यानंतर परप्रांतीयांना मारहाण करण्यात आली होती. मराठी मुद्दा आणि मराठी पाट्यांवरून राजकारण केले. त्यानंतरही अपयश आले. २००९ चा अपवाद सोडता मनसेला अद्यापही यश मिळाले नाही. त्यामुळे आता मराठीच्या ऐवजी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राजकारण करण्याचा मनसेचा विचार आहे.
मनसेच्या नवीन झेंड्यावरून का झाला वाद…
मनसेच्या नवीन झेंड्यांमध्ये शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या राजमुद्रेचा वापर करण्यात आला. राजमुद्रा एक वैशिष्ट आहे. राज्याची अधिकृततची झालर असते. राजमुद्रेचा वापर करणे गैरकृत्य आहे.
तामिळनाडू सरकारने १८ नोव्हेंबर १९५७ रोजी कायदा केला. तशाप्रकारे राजमुद्रेचा समावेश The prevention of insult to National Honor 1971 यामध्ये करावा व केंद्राला शिफारस करावी अशी मागणी आर. आर.पाटील फाऊंडेशनतर्फे विनोद पाटील यांनी तक्रार केली आहे.