पुणे- पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण जवळील अकोले येथे नीरा-भिमा नदीजोड प्रकल्पातंर्गत सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी बोगदा कोसळून ९ मजूर ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास काम संपवून हे मजूर वायररोपच्या मदतीने बाहेर येत होते. मात्र, त्याचवेळी वायररोप तुटून पडल्याने मजूर खाली पडले. त्यानंतर ते बोगद्यात अडकून ठार झाल्याचे पुढे येत आहे. हे मजूर ओडिसा, आंध्र प्रदेश भागातील असल्याचे समोर येत आहे.
केंद्र सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या नीरा भीमा नदी जोड प्रकल्पाचे काम तावशी ते डाळज या २४ किलोमीटर अंतराच्या सहा टप्प्यात जलदगतीने सुरु आहे. नीरा नदीच्या तावशी येथून उजनी धरणाच्या डाळज पर्यंत बोगद्याद्वारे नदी जोड प्रकल्पाचे काम अकोले, काझड, डाळज या ठिकाणी तीन शॉफ्ट मध्ये सुरु आहे. सुमारे तीन किलोमीटर अंतरावर शॉफ्ट खोदून बोगद्याच्या खोदाई सुरु असून या ठिकाणी जमिनीवरून सुमारे शंभर फूट खोल खाली खोदाई करून बोगद्याद्वारे आत मध्ये मशीनच्या साहाय्याने खोदाई सुरु आहे. या कामासाठी तीनशे कामगार काम करीत असून जेसीबी मशीन, मालवाहतूक करण्यासाठीची वाहने यांच्या सहाय्याने काम सुरु आहे.
या कामासाठी सन २०१२ रोजी कामाला सुरुवात करण्यात आली होती मात्र सरकारकडून निधी मिळत नसल्याने मध्यंतरी दोन वर्षे काम बंद होते. तावशी ते डाळज पर्यंत सोमा आणि मोहिते या कंपनीच्या वतीने काम सुरु आहे. या नीरा भीमा नदी स्थिरीकरण जोड बोगदा प्रकल्पाचा मुख्य हेतू नीरा नदीतून येणारे पाणी उजनी धरणात वळवून उस्मानाबाद, सोलापूर या पुणे या जिल्ह्यातील शेतीला आणी लोकांना या पाण्याचा त्याचा उपयोग करून देण्यात येणार आहे.