नवी दिल्ली : जगभरात थैमान घालणारा कोरोना आता महामारी म्हणून जागतिक आरोग्य संघटनेकडून घोषित करण्यात आला आहे. करोना व्हायरसच्या वाढत्या धोक्यामुळे केंद्र सरकारने परदेशी नागरिकांच्या प्रवासावर निर्बंध घातले आहेत. यानुसार १५ एप्रिलपर्यंत कोणतेही परदेशी खेळाडू आयपीएल स्पर्धेसाठी उपलब्ध असणार नाहीत, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील सूत्रांनी म्हटले आहे.
भारतात ६६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. १ लाख ३८ हजार ९६८ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. मुंबईत दोन, पुण्यात आठ तर नागपुरात एक कोरोनाचा रुग्ण आहे. करोनाचे रुग्ण आढळल्यापासून आयपीएल स्पर्धा रद्द करण्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात मद्रास उच्च न्यायालयात याचिका देखील करण्यात आली आहे. आता केंद्र सरकारने परदेशी नागरिकांच्या व्हिसा देण्यावर निर्बंध घातली आहेत. यामुळे आयपीएलमध्ये खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंच्या भारतात येण्यावर निर्बंध आले आहेत.
आयपीएल स्पर्धेसाठी भारतात येणारे परदेशी खेळाडू हे बिझनेस व्हिसावर येत असतात. सरकारच्या नव्या आदेशानुसार ते १५ एप्रिलपर्यंत भारतात येऊ शकत नाहीत, असे बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.
देशात करोनाचे नवे रूग्ण आढळल्याने केंद्र सरकारने व्हिसा देण्यावर निर्बंध घातले आहेत. यातून फक्त सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. करोना व्हायरसमुळे जगभरात ४ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात याचे ६० रुग्ण आढळले आहेत. आयपीएलचा १३वा हंगाम येत्या २९ मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएलला करोनापासून धोका नसल्याने ही स्पर्धा नियोजित वेळानुसार होईल असे बीसीसीआयने याआधीच स्पष्ट केले आहे. आता १४ मार्च रोजी आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलची बैठक होणार आहे. या बैठकीत स्पर्धे संदर्भात काही निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.