महत्वाचे…
१. देशभरातील पालकांच्या मागे मनसे उभी राहील
२. सीबीएसईच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेच्या आधीच फुटल्या, हा सरकारचा हलगर्जीपणा
३. सरकारला जर प्रश्नपत्रिकांची गोपनीयता नीट राखता येत नसेल तर त्यात विद्यार्थ्यांचा काय दोष?
मुंबई : सीबीएसई बोर्डाचा दहावीचा पेपर फुटला असल्याने पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतला आहे. पण या परीक्षेला पुन्हा बसू नका, सरकारच्या बोर्डाच्या चुकीचा ताप पालकांना आणि विद्यार्थ्यांना का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
मनसेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पेपर फुटणे ही बोर्डाची चूक आहे. त्याची शिक्षा पालकांना आणि विद्यार्थ्यांना देता येणार नाही. देशभरातील पालकांच्या मागे मनसे उभी राहील, असे आश्वासन ही त्या पत्रात देण्यात आले आहे. सीबीएसईच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेच्या आधीच फुटल्या, हा मुळात सरकारचा हलगर्जीपणा, पण स्वतःची चूक सुधारायची किंवा मान्य करायची सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावत आहेत? सरकारला जर प्रश्नपत्रिकांची गोपनीयता नीट राखता येत नसेल तर त्यात विद्यार्थ्यांचा काय दोष? त्यांनी का पुन्हा त्या विषयांच्या परीक्षेला बसायचे? असा सवाल राज ठाकरेंनी आपल्या पत्रात केला आहे. माझे देशभरातील पालकांना आवाहन आहे की, कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलांना फेर-परीक्षेला बसवू नका. तुम्ही झुकताय हे जर सरकारच्या लक्षात आले तर ते तुम्हाला अजून वाकवायचा प्रयत्न करेल. तुम्ही निर्णयावर ठाम रहा, सरकारला काय निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ दे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देशभरातील विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या पाठीशी ठाम उभी आहे, उभी राहील, असे राज ठाकरेंनी परिपत्रकात म्हटले आहे.