नवी दिल्ली – लोकसभा आणि राज्यसभेत मंगळवारी कामकाजाच्या दरम्यान काँग्रेसने राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्यावरून गोंधळ घातला. काँग्रेसच्या सदस्यांनी मागणी केली की, पंतप्रधान मोदींनी आपल्या वक्तव्यावर माफी मागावी. राज्यसभेत विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज तहकूब करण्यात आले होते.
दुसरीकडे राजदच्या खासदाराने लालू प्रसाद यादव यांच्या सुरक्षेत कपात केल्या प्रकरणी लोकसभेत स्थगन प्रस्ताव सादर केला. दरम्यान टीएमसी नेत्यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर एफआरडीआय विधेयकाविरोधात निदर्शने केली.
संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी राज्यसभेत दिलेल्या एका लिखित उत्तरात म्हटले होते, की वन रँक, वन पेन्शन मुद्यावर समीक्षा करण्यासाठी कोणत्याही समितीची स्थापणा करण्यात आलेली नाही. सोमवारी लोकसभेत विरोधक व सत्ताधारी सदस्यांमध्ये झालेल्या गोंधळातही पाच विधेयके सादर करण्यात आली. त्यामध्ये लोक प्रतिनिधित्व सुधार विधेयक, राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद अधिनियम, उपदान संदाय संशोधन विधेयक, दंत चिकित्सा सुधार विधेयक आणि भारतीय वन सुधार विधेयक सामील आहे.